वारकरी संतकवयित्रीचे काव्यधन
जगाला समता आणि समन्वयशिलतेचा संदेश देण्यासाठी संत ज्ञानेश्वर नामदेवादी संतांनी तेराव्या शतकात वारकरी संप्रदायाची बांधणी केली. 'यारे यारे लहानथोर । भलते याती नारी नर।।' असा उद्घोष करीत सर्व भेदभावाच्या पलीकडे जाऊन माणूस जोडला. यामुळे विटाळाच्या नावाखाली पिढ्यानपिढ्यापासून सर्वदृष्टीने वंचित आणि उपेक्षित राहिलेल्या स्त्रीला परमार्थाचा अधिकार मिळाला. यामुळे वारकरी संप्रदायात संतकवयित्री मुक्ताबाई, जनाबाई, सोयराबाई, निर्मळा, कान्होपात्रा, बहिणाबाई अशा संतकवयित्रीची एक समृद्ध परंपरा निर्माण झाली. आपली अध्यात्मिक अनुभूती आणि विचारांची अभिव्यक्ती यांनी अभंग छंदातून केली. स्त्रीसुलभ भावनांच्या उत्कट अभिव्यक्तीतून त्यांच्या अभंगवाणीला भावकवितेचे सौंदर्य प्राप्त झाले. त्याचप्रमाणे त्यातून प्रकट झालेल्या विचारातून वैचारिक उंचीचे दर्शन घडते. ज्ञानेश्वरादी भावंडात सर्वात लहान असूनही उच्च कोटीच्या प्रगल्भतेचा आदर्श मुक्ताबाईंनी जगासमोर प्रस्थापित केला. मुक्ताबाईचे त्रेसष्ठ अभंग...